मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१९

सोशल मीडियावर झिंगाट प्रचार

भारतातील सोशल मीडिया व्यासपीठांच्या विस्ताराचा राजकारणाशी संबंध जोडताना २०१४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वीचे राजकारण आणि त्यानंतरचे राजकारण असे दोन महत्त्वाचे टप्पे विचारात घेतले जातात. भारतात फेसबुक, यू-ट्युब आणि ट्विटरचा वापर वाढण्याचा काळ हा २००९ च्या लोकसभा निवडणुकांनंतच्या काळामध्ये मोडतो.
  • २००९ च्या निवडणुकानंतरच्या काळात भारतातील सोशल मीडिया वापरणाऱ्यांच्या प्रमाणामध्ये सातत्याने वाढ झाल्याचे अनुभवायला मिळत आहे. 
  • २०१४ च्या निवडणुकीपूर्वी त्यामध्ये झालेली वाढ ही या निवडणुकांसाठी एक निर्णायक घटक ठरली होती. 
  • सोशल मीडियाचा राजकारणासाठी वापर करून घेण्याची पूर्वतयारी म्हणूनच २०१४ च्या निवडणुकांपूर्वीचा काळ विचारात घेतला गेला. 

  • राजकीय पक्षांनी आपल्या पक्षासाठी आणि पक्षाच्या विविध उमेदवारांसाठी म्हणून सोशल मीडियाच्या व्यासपीठांवरून राजकीय संदेशांचे प्रसारण करू शकणारे छोटे- छोटे गट नेमले होते. 
  • पक्षाच्या वा उमेदवाराच्या प्रचारासाठीचे संदेश तयार करणे, सोशल मीडिया व्यासपीठांवरून ते संदेश मोठ्या प्रमाणावर प्रसारित करणे, नवनवीन मतदारांपर्यंत थेट पोहोचणे, त्यांना विशिष्ट विचारांनी प्रभावित करत अंतिमतः त्याला आपला मतदार बनविणे अशा टप्प्यांमधून या निवडणुकांसाठीची तयारी पूर्ण करण्यात आली होती.
  •  
  • या पूर्वतयारीचे थेट परिणाम २०१४ च्या निवडणुकांमधून राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर थेट अनुभवायला मिळाले. 

  • सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या व्यासपीठांवर प्रभावीपणे प्रचार- प्रसार करणारे नेते आणि पक्ष या निवडणुकीमध्ये विजयी झाले.

  • माध्यमाधारित राजकारणामध्ये, २०१४ पूर्वीच्या काळात पारंपरिक प्रसारमाध्यमांना राजकारण्यांकडून महत्त्व दिले जात असे. मात्र, सोशल मीडियाच्या वाढत्या विस्ताराने हे चित्र काहीसे बदलायला सुरुवात केली.

  • प्रसारमाध्यमांच्या भारतातील विस्ताराच्या इतिहासाच्या टप्प्यांमध्ये स्वातंत्र्यपूर्वकालीन माध्यमे- स्वातंत्र्योत्तर माध्यमे, ‘खा-उ-जा’ धोरणापूर्वीची माध्यमे- ‘खा-उ-जा’ धोरणानंतरची माध्यमे, इंटरनेटपूर्वीची माध्यमे- इंटरनेटनंतरची माध्यमे, मोबाईलपूर्वीची माध्यमे- मोबाईलनंतरची माध्यमे, सोशल मीडियाच्या आगमनापूर्वीची माध्यमे आणि सोशल मीडियाच्या आगमनानंतरची माध्यमे असे ढोबळ वर्गीकरण करता येते.
  • अगदी त्याच संदर्भाने आपल्याला अशी माध्यमे वापरू शकणाऱ्यांच्या माध्यमांविषयीच्या जाणीवा, माध्यमांमधून समोर मांडल्या जाणाऱ्या आशयाविषयी विचार करण्याची क्षमता, माध्यमांसाठी स्वतः आशय तयार करण्याची प्रेरणा आणि त्यासाठीच्या क्षमता आदी बाबींचाही आढावा घेणे गरजेचे ठरते. 
  • देशात खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार झाल्यानंतरच्या काळात माध्यमांची मालकी अधिक व्यापक बनली. व्यवसाय हा महत्त्वाचा भाग बनला.
  • व्यवसायवृद्धीसाठीची राजकीय भूमिका ही अगदी सहजपणेच घेतली जाऊ लागली. 
  • सोशल मीडियाच्या आगमनाने तर राजकीय प्रचाराला अभूतपूर्व वेग मिळाला. त्या पूर्वीच्या काळात हा प्रचंड वेग कधीही नव्हता.
  • राजकीय प्रक्रियेला माध्यमांकडून मिळणारी दिशा ही संथपणाची होती. मात्र तत्त्कालिन समाजजीवनाचा एकूण वेग विचारात घेतला, तर हा संथपणाही अपेक्षित राजकीय परिणाम घडवून आणू शकत होता. 
  • सोशल मीडियाच्या भारतामधील विस्तारापूर्वीच्या काळात वेगवान राजकीय बदल घडवून आणण्याच्या माध्यमांच्या क्षमतेला तशा मर्यादाच होत्या. 
  • या कालखंडाचा वेगळ्या संदर्भाने विचार केला, तर हा कालखंड होता, स्वातंत्र्यानंतरच्या साधारण ६०- ६५ वर्षांचा. 
  • त्या नंतरच्या टप्प्यावर खरं तर २०१४ ची लोकसभा निवडणूक झाली. नुकतीच झालेली गुजरातमधील बहुचर्चित निवडणुकही याच टप्प्यावर झाली.
  • या टप्प्यावरचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आता सोशल मीडियाची व्यासपीठे ही पारंपरिक माध्यमांइतकीच मुख्य प्रवाहातील माध्यमे म्हणून  प्रस्थापित झाली आहेत. 
  • भारतामध्ये सोशल मीडिया व्यासपीठांचे सार्वत्रिकीकरण होण्यापूर्वीच्या काळामध्ये पारंपरिक माध्यमांमधून आपल्या प्रतिमानिर्मितीसाठी म्हणा वा प्रचार-प्रसारासाठी म्हणा, राजकारण्यांना केवळ माध्यमकर्मींवरच अवलंबून राहावे लागत होते. त्याकामी कार्यकर्ते तसे फारसे उपयोगी ठरत नव्हते.
  • आता डिजिटल कार्यकर्त्यांच्या फळ्याच तयार झाल्या आहेत, अगदी प्रोफेशनल! 
  • या फळीतील कार्यकर्ते हे समाजमाध्यमे वा नवमाध्यमे वापरून घेण्यात पटाईत असतात. 
  • या फळ्या केवळ आपल्या नेत्याची प्रतिमानिर्मितीच करत नाहीत, तर विरोधी नेत्याची-पक्षाची प्रतिमाहनन करण्याची जबाबदारीही पार पाडत आहेत. 
  • माध्यमांसाठी महत्त्वाचा असणारा त्यांचा ग्राहक आणि त्याची आशय समजून- उमजून घेण्याची क्षमताही या कामी एक वेगळी भूमिका बजावते आहे. 
  • या पूर्वीचा काळ हा माध्यमकर्मींनी पुढे आणलेल्या आशयावर भाष्य करण्याचा काळ होता. 
  • आता केवळ माध्यमकर्मींनी निर्माण केलेला आशयच नव्हे, तर अगदी कुठल्यातरी गल्लीतल्या कोणा एखाद्या व्यक्तीने सोशल मीडिया वापरून अपलोड केलेल्या फोटो आणि व्हिडिओवरही सखोल चर्चा होण्याचा काळ आला आहे. 
  • माध्यमकर्मींची आशय तयार करण्याची मक्तेदारी तशी संपल्यात जमा आहे. सर्वसामान्य नागरिकही आशय तयार करू शकतो आणि समाजमाध्यमांच्या आधारे तो मोठ्या प्रमाणावर प्रसारितही करू शकतो. अर्थात या आशयाच्या सत्यासत्यतेविषयीचे प्रश्नचिन्ह अद्यापही कायमच आहे. 
  • तसेच, या आशयाच्या विश्वासार्हतेविषयी प्रश्न उपस्थित करण्याविषयीच्या सर्वसामान्यांच्या समजेविषयीही आपल्याकडे प्रश्न उपस्थित होऊ शकतो. 
  • त्यामुळे असाच कोणी सर्वसामान्य असल्याचे भासवून सर्वसामान्यांच्या पद्धतीने अगदी हुशारीने आपल्याला हवा तो राजकीय परिणाम साधू शकणारा आशय प्रसारित करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्याही आता वाढू लागली आहे. 
  • भारतात सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होत असताना, २०१४ च्या निवडणुकीपूर्वीच्या काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण होण्याला चालना मिळाली होती. 
  • त्याचे राजकीय परिणाम त्या निवडणुकीच्या निकालांमधूनही सर्वांनी अनुभवले. 
  • तत्कालीन सत्ताधारी आणि तत्कालीन विरोधक यांच्यामध्ये असलेल्या फरकातला तो कळीचा मुद्दा ठरला होता. आता मात्र केवळ सत्ताधारीच नव्हे, तर विरोधकही या बाबतीत तितकेच सक्रीय झाले आहेत. 
  • अगदी मोजक्या काळामध्ये माध्यमाधारित, विशेषतः सोशल मीडियावर आधारलेल्या राजकारणामध्ये झालेले हे बदल सर्वसामान्य नागरिक आणि अभ्यासकांसाठीही तितकेच महत्त्वाचे ठरणारे आहेत.

(@प्रा.योगेश_बोराटे यांच्या #सोशल_मीडिया या मराठी पुस्तकातून साभार.)
-------------------------------------------------------------
Prof. Yogesh Borate 
Mobile: 9975220225 
या खालील लिंक्सवर हे पुस्तक उपलब्ध आहे.
-------------------------------------------------------------
मित्र हो, हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत... 
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा.  mejagalya@gmail.com

आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. 
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा