सातारा येथील संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री महामाता भीमाबाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी प्रसिद्ध साहित्यिक शिल्पा कांबळे, मुंबई यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळे व उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे यांनी दिली .
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने साहित्य, कला, संस्कृती व परिवर्तनाची चळवळ आदी क्षेत्रात मौलिक योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करण्याच्या हेतूने १९९८ पासून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह, शाल असे आहे.
या वर्षीचा २२ वा पुरस्कार स्टार प्रवाह वाहिनीवरील 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवगाथा' या सध्या गाजत असलेल्या मालिकेच्या पटकथा लेखिका, प्रसिद्ध कथाकार नाटककार शिल्पा कांबळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापुर्वी एक डिसेंबर २०१९ रोजी नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये ज्येष्ठ साहित्यिक प्रसिद्ध कवी प्रमोद मनोहर कोपर्डे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे .
या वर्षीच्या पुरस्काराच्या मानकरी शिल्पा कांबळे या प्रसिद्ध मराठी कादंबरीकार आहेत. त्यांची 'निळ्या डोळ्यांची मुलगी' या २०१४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या बहुचर्चित कादंबरीचे सर्व थरातून मोठे स्वागत झाले आहे. 'नऊ चाळीसची लोकल' हा कथासंग्रह मुक्तशब्द प्रकाशनच्या वतीने प्रकाशित झाला आहे. मुक्तशब्द व नवअनुष्टुभ सारख्या प्रितिष्ठित मासिकातून त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध झाल्या आहेत.
'बिर्याणी' या त्यांच्या नाटकास महाराष्ट्र राज्य नाट्य पुरस्काराने गौरविण्यात आले असून पुणेच्या काफिला प्रोडक्शनच्या अँब्स्ट्रॅक्ट थिएटर व कल्याणच्या इम्पेरिकल थिएटरच्या वतीने या नाटकाचे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रयोग झाले आहेत. सन २०१७ मध्ये त्यांच्या नाट्य लेखनासाठी झी गौरव पुरस्काराचे मानांकन मिळाले आहे. सोनी मराठी वाहिनीवरील 'ती फुलराणी' या मालिकेचे संवाद लेखनही त्यांनी केले आहे.
जातीय अत्याचार, लिंगभेद व मानवी स्वातंत्र्य, महिला समस्यांवर त्यांनी मान्यवर दैनिकातून लेखन करून वाचा फोडली आहे. स्किपटीज क्रिएशन, मुंबई या लेखक फोरम बरोबर त्या काम करीत आहेत. सध्या त्या मुंबई येथे आयकर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
पद्मश्री दया पवार पुरस्कार, कायद्यानेवागा लोक चळवळीचा सावित्री पुरस्कार, बोधी कलमंचचा अश्वघोष पुरस्कार, कणकवलीचा तांबे पुरस्कार, सुभाष भेंडे वांड्मय पुरस्कार आदी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे.
भीमाबाई आंबेडकर पुरस्कारानेआतापर्यंत
- डॉ. ज्योती लांजेवार (नागपूर),
- प्रा. पुष्प भावे (मुंबई),
- रझिया पटेल (पुणे),
- बेबीताई कांबळे (फलटण),
- यमुनाबाई वाईकर( वाई),
- उर्मिला पवार (मुंबई),
- डॉ. सिसिलिया कार्व्हालो (वसई),
- प्रा. इंदिरा आठवले (नाशिक),
- पद्मश्री तिस्ता सेटलवाड (मुंबई),
- हिरा बनसोडे (मुंबई),
- प्रतिमा जोशी (मुंबई),
- उल्का महाजन (पनवेल),
- प्रा. सुशीला मूल-जाधव (औरंगाबाद),
- डॉ. गेल ऑम्वेट (कासेगाव),
- मेधाताई पाटकर (मुंबई),
- संध्या नरे-पवार (मुंबई),
- मुक्ता दाभोलकर (दापोली),
- मुक्ता मनोहर (पुणे) व
- प्रा. आशालता कांबळे (मुंबई)
----दिनकर झिंब्रे
(सदर माहिती व्हाट्सअप ग्रुप वरून साभार)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा