गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

कायद्याच्या चौकटीत बसवून हुकूमशाहीचा अंमल सुरू @दीपक_जाधव

केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या सरकारांकडून पोलीस, सीबाआय, ईडी या संस्थांमध्ये हस्तक्षेप करणे यात नवीन काही नाही.

दीपक जाधव
पूर्वी हे केवळ हस्तक्षेपापुरतेच मर्यादित होते. मात्र सध्या सत्तेवर असलेल्या मोदी-शहांच्या सरकारने (भाजपाच्या नव्हे...कारण इतर कोणत्याही मंत्र्यांचे अस्तित्व दिसत नाही) आता सगळंच बदलून टाकले आहे. 
राज ठाकरे, पी. चिदंबरम यांच्यासह एनडीटीव्हीच्या प्रणव रॉय आणि त्यांची पत्नी राधिका यांच्या मागे ईडीची चौकशी लावण्यात आली आहे. इतर वृत्तवाहिन्यांप्रमाणे सरकारचे बटीक होण्यास प्रणव रॉय यांनी नकार दिल्याने त्यांच्यावर सूड उगविण्यात आला हे जगजाहीर आहे. राज ठाकरे यांनी मोदी सरकारचा बुरखा फाडला म्हणून तर चिदंबरम यांनी शहा यांना अटक केली होती. म्हणून त्यांच्या मागे ईडी लावण्यात आल्याच्या चर्चा सगळीकडे सुरू आहेत. सारं काही इतक्या उघडपणे सुरू आहे की यात काही लपविण्याची आवश्यकताही सत्ताधीशांना वाटत नाही. सीबीआय, ईडी, रिझर्व्ह बँक, आदी तत्सम संस्था मोदी-शहा यांच्या इशाऱ्यावर नाचू लागल्या आहेत. या संस्थानवरचा लोकांचा विश्वास उडू लागला आहे.
मोदी यांचा केंद्रातील सत्तेवरचा दुसरा कार्यकाळ हा अत्यंत अनपेक्षित, अनाकलनीय व सूड बुद्धीने खचाखच भरलेला आणणार आहे, हे एव्हाना स्पष्ट झालं आहे. 
एकीकडे देश भयानक मंदीला सामोरा जात आहे, या मंदीमुळे अनेक गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार असल्याची चिंता अर्थतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. केंद्र सरकारने तातडीने त्याला अटकाव करण्याचे प्रयत्न सुरू करण्याऐवजी विरोधकांवर सूड उगविण्यात मोदी-शहा गुंग झाले आहेत. त्यांचे अनेक भक्तजण त्यावरही टाळ्या पिटत आहेत.
हे सरकार पाशवी बहुमताने या देशातील जनतेने निवडून दिले आहे (जर ईव्हीएम घोटाळा झाला नसेल तर). त्यामुळे या सरकारच्या सर्व कृत्यांसाठी अंतिमतः तेच जबाबदार आहेत. जनतेला त्यांच्या लायकीप्रमाणे सरकार मिळते, आपल्याला आपल्या लायकीप्रमाणेच सरकार मिळाले आहे.
ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी "मोदी पुन्हा सत्तेवर आले तर देशात हुकूमशाहीची सुरुवात होईल" असे मत व्यक्त केले होते. त्यावेळी ते मनाला फारसं पटलेलं नव्हतं, मात्र मोदींचा पहिल्या शंभर दिवसातील एकंदर कारनामे पाहता पुढची साडे चार वर्षे आणखी काय-काय होणार आहे याची कल्पना करवत नाहीय.
आजवरच्या जगाच्या इतिहासात हिटलरचा कार्यकाळ अत्यंत वाईट समजला जातो. किमान तितकी वाईट वेळ तरी भारतावर येणार नाही अशी अपेक्षा आहे. 
पण सुजाणांनी दूरदृष्टी ठेवावी असं म्हणतात, समजा हिटलर सारखेच आपले सत्ताधीश ही पुढच्या काळात उन्मत्त झाले तर त्यांना रोखण्यासाठी काय-काय करावे लागेल याची तयारी करण्याची वेळ आता आली आहे. 
इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी ही दृश्य स्वरूपात होती, त्याविरोधात रस्त्यावर उतरून जनतेने संघर्ष केला. आता थेट आणीबाणी न लादता कायद्याच्या चौकटीत बसवून राबवायच्या हुकूमशाहीच्या पर्वाची सुरुवात झाली आहे. 
मात्र आजवर होऊन गेलेल्या सर्वच हुकूमशहायांचा शेवट अत्यंत वाईट झालेला आहे, हा इतिहास आपल्यासोबत आहे. मात्र त्या हुकूमशाहीचा सामना करण्यासाठी मोठी किंमत मोजण्याची तयारी ही आपल्याला ठेवावी लागणार आहे. 
सत्य, विवेकवादी विचार, धैर्य, संयम, चिकाटी, समता, बंधुभाव आदींच्या मदतीने कायद्याच्या चौकटीत बसवून राबविल्या जात असलेल्या हुकूमशाहीच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी सज्ज व्हावे लागेल.

(ता. क. - सध्या तरी घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आधारे जाहीरपणे मत व्यक्त करू शकतोय. मात्र हे स्वातंत्र्य आणखी किती दिवस मिळेल याची धाकधूक मनात नक्कीच आहे, असो)
-------------------------------------------------@दीपक_जाधव
(लेखक हे राजकीय घडामोडींचे विश्लेषक असून दै. पुढारी, पुणे आवृत्तीचे वरिष्ठ बातमीदार आहेत.)
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2691562854208600&id=100000647355855
----------- --------------- --------------- -------
यानिमित्ताने 'आली अंगावर' या दादा कोंडके यांच्या चित्रपटातील 'अडला नारायण धरी गाढवाचे पाय हो...' या गाण्याची आठवण होते. त्याची लिंक खाली दिली आहे. सदर गाणं पहायला विसरू नका.
https://youtu.be/ELUAz2VUrWY
-------------------- ---------- ----------------
मित्र हो, हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत... 
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा.  mejagalya@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा