गुरुवार, १९ डिसेंबर, २०१९

लाख मोलाच्या भेटीची गोष्ट... ॲड. दिग्विजय ठोंबरे

 डॉ. श्रीराम लागू 
वडिलांची बदली पुण्याला झाल्याने स्वारगेट पोलीस लाईन मध्ये राहण्यास नुकतंच आलो होतो.पुण्याबद्दल बरच ऐकून होतो पण यावेळी मात्र पुण्यात वास्तव्यासच असल्याने जे ऐकून होतो ते प्रत्यक्ष पाहण्याची व अनुभवण्याची संधी प्राप्त झाली होती. याच संधीचा मी पुरेपूर फायदा उठवत असताना पुण्यामध्ये चालत, पीएमटीने, गाडीवर भरपूर फिरलो. स्वारगेट पोलीस लाईन जवळच गणेश कला क्रीडा मंच असल्याने तिथे आयोजिलेल्या भरपूर कार्यक्रमास हजेरी लावली व मनसोक्त आनंद लुटला.असच एक दिवशी गणेश कला क्रीडा मंच कडे जात असताना त्याच्या बाजूलाच असलेल्या मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स च्या बाहेर गर्दी दिसली व पावले आपसूकच तिकडे वळली.उत्सुकतेपोटी गर्दी जमण्यामागील उद्देश जाणून घेत असताना एका गृहस्थाकडुन समजले की येथे पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आहे व त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्रीराम लागू येणार आहेत. ज्या व्यक्तिमत्वास आतापर्यंत विविध चित्रपटात पाहिले व नाट्य,चित्रपट सृष्टीमध्ये ज्यांनी आपल्या कसदार अभिनयाने आपली स्वतःची विशेष अशी एक ओळख निर्माण केली अश्या डॉ. श्रीराम लागू सरांस भेटण्यासाठी  सभागृहात मोक्याची जागा पटकवून मी सरांची वाट पाहू लागलो.थोड्याच वेळात लागू सरांचे प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात आगमन झाले.मी त्या टाळ्यांच्या कडकडाटास हातभार लावत असताना थोडी देखील कसूर केली नाही.लागू सरांस प्रत्यक्ष पाहताना होत असलेला आनंद त्याच्या परिसीमेचे उल्लंघन करत होता. व्यासपीठाकडे जात असताना ते एका मुलाच्या खांद्यावर हात टाकून हळू हळू चालत होते. वय झाल्याने त्यांनी त्या मुलाच्या खांद्याचा आधार घेतला होता. पुढे कार्यक्रम उत्तम पार पडला. त्यामध्ये लागु सरांनी भाषण करीत असताना स्पष्ट व परखडपणे त्यांची मते मांडली व ती मांडत असताना सद्यपरिस्थिवर जोरदार प्रहार केला. कार्यक्रम संपताच श्रीराम लागू सर व्यासपीठावरील उपस्थित एका व्यक्तीच्या मदतीने व्यासपीठावरून खाली आले व त्या मुलाची वाट पाहू लागले की ज्याच्या खांद्यावर हात ठेवून ते व्यासपीठापर्यंत गेले होते. ही गोष्ट माझ्या लक्षात आली व गर्दीतून वाट काढत मी लागू सरांपर्यंत पोहचलो. प्रथम त्यांच्या पाया पडलो व त्या मुलास उशीर होत असल्याचे पाहून मी लागू सरांस म्हणालो,

"चला सर मी सोडतो तुम्हाला गाडीपर्यंत"
त्यांनी देखील त्या मुलाचे काहीतरी नाव घेऊन "कुठे गेला तो?" असा प्रश्न केला व माझ्या खांद्यावर हात ठेवला व आम्ही दोघ त्या सभागृहातून चालू लागलो. सभागृहातील व्यक्तींला असे वाटत होते की मी त्यांचाच माणूस आहे. त्यावेळी माझं पूर्ण लक्ष हे त्यांनी माझ्या खांद्यावर ठेवलेल्या हाताकडे व त्यामुळे होणाऱ्या स्पर्शाच्या जाणिवेकडे होत.हळूहळू चालत आम्ही त्यांच्या गाडीपर्यंत आलो.तो मुलगा गाडीजवळच उभा होता त्याच्या मदतीने लागू सर गाडीमध्ये बसले त्यावेळी मी त्यांस त्यांची स्वाक्षरी एका कागदावर मागितली असता ते म्हणाले,

"आता हात थरथर कापतो त्यामुळे स्वाक्षरी करता येत नाही"

मी म्हणालो,

"सर तुम्हाला पुन्हा कुठे भेटता येईल?"

त्यावर त्यांनी त्यांच्या सोबत असलेल्या मुलास

"यांला घरचा पत्ता व संपर्क क्रमांक दे"

असे सांगितले.स्वाक्षरीसाठी हातात असलेल्या कागदावरच पत्ता व फोन नंबर मी लिहून घेतला व त्यांची गाडी तिथून निघून गेली.
एवढीच काय त्यांची अन माझी अल्पशी ओळख. श्रीराम लागू सरांसोबत थेट संपर्क साधता आल्याच्या आनंदात मी घर गाठले.
पुढे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे एम एस सी साठी प्रवेश मिळाल्याने मी राहुरीला गेलो. एखाद्या सणाचे औचित्य साधून मी लागू सरांस अधून मधून फोन करून शुभेच्छा देत असे.एकदा त्यांच्या वाढदिवसाला फोन करून शुभेच्छा देताना मी म्हणालो,

"सर तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो."

त्यावर ते म्हणाले,
"ईश्वर चरणी प्रार्थना करून जर उत्तम आरोग्य लाभत असत तर दवाखाने कश्यासाठी निघाले असते."
त्यांच हे वाक्य ऐकून माझ्या हातातील फोन खाली पडायचंच बाकी होत. पण ज्या ज्या वेळी मी त्यांच्याशी बोलत असे त्या त्या वेळी एक वेगळाच आनंद अनुभवयास मिळत असे. मी नेहमी फोन करत असल्याने त्यांच्याशी जवळीक साधता आली. त्यांचे शब्द ऐकण्याचे भाग्य माझ्या कानास प्राप्त झाले.लागू सरांच्या घरातील व्यक्ती त्यांस "दादा" या नावाने संबोधत असल्याने मी देखील ज्यावेळी त्यांस फोन करत असे त्यावेळी "दादा आहेत का, त्यांच्याशी बोलायचं होत" अशी इच्छा प्रदर्शित करत असे.घरातील व्यक्ती देखील खासकरून त्यांच्या पत्नी दीपा लागू मॅडम या सरांच व माझं बोलणं करून देत असत.फोन वरून का असेना परंतु डॉ. लागू सरांसोबत असलेली माझी ही ओळख मला प्रचंड उर्जा देऊन गेली.वकील झाल्यावर लागू सरांस प्रत्यक्ष भेटून या नटसम्राटाच्या पायाशी लीन होऊन त्यांचे आशीर्वाद घेण्याची ओढ मला लागली होती.त्या ओढीतूनच मी मागील महिन्यात फोन केला असता दीपा लागू मॅडम म्हणाल्या,

"दादा सध्या आजारी आहेत,ते समोर आलेल्या व्यक्तीला ओळखत देखील नाहीत तेव्हा तुम्ही थोड्या दिवसानंतर फोन करून भेटायला या"

मी वाट पाहत होतो त्यांची तब्बेत ठीक होण्याची परंतु काल ते गेल्याची बातमी समजताच डोळ्यात पाणी तर आलच पण या नटसम्राटाला भेटायचं राहूनच गेलं अस वारंवार वाटू लागलं.
डॉ.श्रीराम लागू सर यांस भावपूर्ण श्रद्धांजली व सलाम

अॅड.दिग्विजय.ठोंबरे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा